धारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार प्रोत्साहन
- आ. वर्षा गायकवाड यांचा खास उपक्रम
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण-गौरव व बक्षीस समारंभ सोहळा
मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - दुर्बल आर्थिक परिस्थितीशी सामना करत शैक्षणिक क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या धारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार वर्षा गायकवाड यांनी गुण-गौरव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे. इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीधर या परीक्षांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आ. गायकवाड हा सोहळा दरवर्षी आयोजित करतात. यंदा हा सोहळा ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर रोजी असलेल्या जयंतीच्या निमित्ताने २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत अनेक गुणवंत विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत असतात. अनेकांना घरच्या खडतर परिस्थितीमुळे काम करत करत शिकावे लागते. मात्र शिक्षणाचा ध्यास असलेल्या या विद्यार्थ्यांना कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळत नाहीत. हीच उणीव आमदार वर्षा गायकवाड दरवर्षी दूर करतात. यंदा होणाऱ्या कौतुक सोहळ्यासाठी १० वी, १२ वी आणि पदवी परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव केला जाईल. तसंच धारावी मतदारसंघातून १०वी, १२ वी आणि पदवी परीक्षेत पहिल्या आलेल्या गुणवंतांना लॅपटॉप बक्षीस म्हणून दिला जाईल. त्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरून धारावी काँग्रेस ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत. हा सोहळा २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी धारावी येथील शाहूनगर मैदान येथे होईल. १९ सप्टेंबर ते २० ऑक्टोंबर पर्यंत नोंदणी करणाऱ्या मुलांचा गौरव केला जाईल. त्यामुळे गुणगौरव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करा.
काय असेल बक्षीस ??
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात उपयोगी पडतील अशा वस्तू बक्षीस स्वरूपात दिल्या जातील. यात बॅग, घड्याळ, स्मार्ट वॉच, स्मार्ट टॅब आणि लॅपटॉप यांचा समावेश असेल. शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थी टॅब आणि लॅपटॉप वापरू शकतात. या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे या बक्षिसांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल.
0 टिप्पण्या