देशात मनुवाद विरुद्ध संविधानवाद लढा सुरू
- मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचं प्रतिपादन
- अनुसूचित विभागाच्या पदग्रहण सोहळ्यात सरकारवर हल्लाबोल
- कचरू यादव यांची अनुसूचित विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - देशात सध्या मनुवादी मनोवृत्तीच्या राजकारण्यांनी संविधानाचं खच्चीकरण सुरू आहे. पण त्याला उत्तर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असा घणाघात मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला. सोमवारी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात अनुसूचित विभागाचे नवीन पदाधिकारी नेमण्याचा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात कचरू यादव यांची अनुसूचित जमातीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष रमेश कांबळे यांनी कचरू यादव यांच्याकडे पदभार दिला.
केंद्रात आणि राज्यातही सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने चालणारं सरकार आहे. हे सरकार मनुवादी मनोवृत्तीने काम करत आहे. देशात आतापर्यंत समाजांमध्ये असलेली एकी फोडून आपण राज्य करण्याकडे या मनुवादी वृत्तीचा भर आहे. त्याला उत्तर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच घटकांनी एकत्र येत या मनोवृत्तीचा निषेध केला पाहिजे, अशी भावना मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
अनुसूचित विभागाने याआधीही काँग्रेसला साथ दिली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री एकनाथजी गायकवाड यांनी अनुसूचित विभागाला चांगलं महत्त्वं दिलं होतं. यापुढेही हा विभाग काँग्रेसचं काम घराघरांमध्ये पोहोचवले. मुंबईत काँग्रेस विचारांचा प्रसार करण्याची कामगिरी अनुसूचित विभाग बजावेल, अशी भावना नवनियुक्त अध्यक्ष कचरू यादव यांनी व्यक्त केली.
या वेळी मंचावर प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासह अनुसूचित विभागाचे माजी अध्यक्ष रमेश कांबळे, माजी आमदार अशोक जाधव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि नगरसेविका आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या